एका गुरूंच्या आश्रमात एक ख्यातकीर्त शिष्य आला होता. त्याचा चहूदिशांना डंका वाजत होता. त्याच्या वादविवादकौशल्याची सगळीकडे चर्चा होती. त्या गुरूंकडे एक विद्वान आले होते. त्यांची आणि या शिष्याची काही चर्चा सुरू झाली. तिने लवकरच वादविवादाचं, शास्त्रार्थाचं रूप घेतलं आणि घनघोर शाब्दिक युद्धच सुरू झालं.
गुरू शांत बसून पाहात होते.
शिष्याने नेहमीच्या सराईतपणाने समोरच्या विद्वानाला नामोहरम केलं. ते विद्वान महोदय तोंड पाडून निघून गेले.
शिष्याने विजयी मुद्रेने गुरूकडे पाहिलं.
गुरू म्हणाले, तू एवढा वेळ एवढी बकवास कशी काय करू शकतोस? काही मौलिक काम कधी करणार आहेस की असंच टर्रेबाजीत आयुष्य दवडणार आहेस?
शिष्य चमकला. म्हणाला, मी एवढा मोठा वादविवाद जिंकला, इतकी मौलिक मांडणी केली, त्याचं काय?
गुरू म्हणाले, जे तूच सांगायला हवं होतंस आणि जे न सांगितल्याने जगाचं नुकसान झालं असतं, असं तू काय बोललायस?
शिष्य मौन झाला.
गुरूंनी विचारलं, आता कळलं?
त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो मौनच राहिला.
समाधानाने मान डोलावत गुरू म्हणाले, आता कळलं!
-ओशो
No comments:
Post a Comment